*सोनईतील कौतुकी नदी पुनरुज्जीवन व सुशोभीकरण उपक्रमाचा 12 मे रोजी शुभारंभ*
दै.नगरशाही सोनई प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार, समाजकारण, राजकारण साहित्य क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ नेते तथा माजी खा यशवंतराव गडाख पाटील यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त सोनई येथे कौतुकी नदी पुनरुज्जीवन व सुशोभीकरण उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून तसेच सोनई ग्रामस्थ ,विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या सक्रिय सहभागातून हा लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

मुळा उद्योग समूहाचे संस्थापक तसेच नेवासा तालुक्याच्या जिल्ह्याच्या सहकार, शैक्षणिक, सामाजिक प्रगतीचे शिल्पकार म्हणून ओळख असलेल्या मा खा यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व कौतुकी नदी स्वच्छता अभियान शुभारंभ मंगळवार, दि. 12 मे रोजी सकाळी 9 वाजता रामझिरा मंदिर सोनई ता नेवासा येथे आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही यशवंतराव गडाख यांच्या संकल्पनेनुसार वाढदिवस साधेपणाने साजरा करत समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. डामडौल, बॅनरबाजी, आतषबाजी यांसारख्या अनावश्यक खर्चांना फाटा देत लोकांसाठी दीर्घकाळ उपयोगी पडतील असे उपक्रम राबविण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे.
सोनई शहराची जीवनदायिनी मानली जाणारी कौतुकी नदी गेल्या काही दिवसांपासून दुर्लक्षित झाली असून वाढती लोकसंख्या, नदीपात्रात टाकला जाणारा कचरा तसेच सांडपाण्यामुळे नदी परिसर अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे नदीचे खोलीकरण, स्वच्छता आणि सुशोभीकरण करून तिचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प यंदा करण्यात आला आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ श्री संत ज्ञानेश्वर संस्थान, नेवासाचे वेदांताचार्य ह.भ.प. देवीदास म्हस्के महाराज यांच्या शुभहस्ते होणार व जेष्ठ साहित्यिक मा खा यशवंतराव गडाख उपस्थितीत संपन्न होणार आहे . या कार्यक्रमास नेवासा तालुक्यातील युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले आहे.
यापूर्वीही यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून यशवंतराव गडाख यांच्या प्रेरणेने गाव दत्तक उपक्रम, ‘गाव तिथे वाचनालय’, मुलींचे दत्तक पालकत्व, वृक्षारोपण व संगोपन चळवळ, साध्या विवाहाचा संकल्प, नेत्रदान व मरणोत्तर नेत्रदान यांसारखे विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले आहेत.










