नेवासा प्रतिनिधी – समीर शेख
विठ्ठल विठ्ठल,जय हरी विठ्ठल “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…” आणि “वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा | निसर्ग जपा, समृद्ध महाराष्ट्र घडवा!” या पर्यावरणपूरक संदेशांचा जयघोष करत, अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील कै. संत हरीभाऊ आनंदराव घाडगेपाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज ‘सर्वमंगल सोहळा’ अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेली भव्य वृक्षदिंडी, बालदिंडी आणि पालखी मिरवणूक आज २४ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:१० वाजता विद्यालय प्रांगणातून मोठ्या थाटामाटात काढण्यात आली.
भक्तीमय वातावरणात दिंडीचे प्रस्थानसोहळ्याची सुरुवात “विठ्ठल विठ्ठल.. जय हरी विठ्ठल” च्या जयघोषात झाली. पारंपारिक पोशाखात नटलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या बालदिंडीमध्ये अतिशय उत्साहाने सहभाग घेतला होता. टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलाच्या अभंगांमुळे संपूर्ण शालेय परिसर भक्तीमय वातावरणाने प्रफुल्लीत झाला होता. या दिंडीदरम्यान सर्व गुरुजनांनी व विद्यार्थ्यांनी एकत्रित येत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला,तो प्रसंग या सोहळ्याचे मुख्य आकर्षण व उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. विद्यार्थ्यांनी गावातून फेरी काढत ग्रामस्थांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाविषयी प्रभावी जनजागृती केली
तर या मंगलमयी प्रसंगी कॅडेट शिवराज केसभट,ओंकार नरके व कावेरी भेंडेंकर या विद्यार्थ्यांनी यांनी भक्तिगीतांचे गायन केले.
यावेळी विद्यालयाच्या प्रशासक मनिषा राऊत आणि प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कालिदास बडे व सूत्रसंचालन शरद कराड यांनी केले, तर उपस्थितांचे व ग्रामस्थांचे आभार बाळासाहेब काळे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन विद्यालयाच्या सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मिळून केले.










