भेंडा – दै.नगरशाही वृत्तसेवा
हॉटेलमध्ये चहा पिणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आरोग्यास घातक व प्रदूषणात भर टाकणारे प्लास्टिकचे कप धोकादायक असून याकडे अन्न व औषध प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ते बंद करण्याची मागणी भारतीय जनसंसदच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भारतीय संसदचे राज्य निमंत्रक अशोक सब्बन,जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे,ऍड. कारभारी गवळी,पोपटराव साठे, वीर बहादूर प्रजापती, रामराव भदगले, कैलास पठारे राजकुमार गांधी,कारभारी गरड, प्रा.नानासाहेब खराडे, म्हातारदेव ढाळे, कुमार डावखर, रंजन लोखंडे, सचिन साळुंके, फकीर मोहम्मद शेख, शब्बीरभाई पठाण, मधुकर पाटेकर, रईस शेख, शंकरराव फटांगरे आदींनी म्हटले आहे की, प्लास्टिकचे कपात उकळता चहा टाकल्यावर रासायनिक प्रक्रिया होते. त्यामुळे मानवी आरोग्यास कॅन्सर सारख्या भयानक आजाराला निमंत्रण मिळते. हल्ली सर्वत्र सर्रास प्लास्टिकचे कप वापरण्यात येतात.त्या प्लास्टिकच्या कपाचे विघटन होत नसल्याने ते पर्यावरणास हानिकारक व अतिशय घातक आहेत. यापूर्वी जिल्हाधिकारी यांचे कडे पत्राद्वारे मागणी करूनही या जनहिताच्या महत्त्वपूर्ण प्रश्नात दुर्लक्ष केले गेले. सध्या अन्न औषध विभागाची धडाकेबाज कामगिरी चालू असून नागरिकांनी त्याबाबत उत्स्फूर्त स्वागत व समाधान व्यक्त केले आहे. म्हणून या व्यापक जनहिताच्या व आरोग्यास घातक असलेल्या चहाचे प्लास्टिक कपावर तातडीने बंदी घालण्याची विनंती.










