८५ किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प लोकार्पण…
भेंडा(वार्ताहर):– जिल्ह्यातील अनेक पाणी योजना बंद पडल्या, अनेक योजना वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत आलेल्या असतांनाही भेंडा-कुकाणा व इतर चार गावांची नळ पाणी योजना ही जिल्ह्यातील एक चांगली व सक्षम पाणी पुरवठा योजना असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील भेंडा-कुकाणा व इतर ४ गावांच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेकरिता बसविण्यात आलेल्या ८५ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री. अभंग बोलत होते. तुकाराम मिसाळ, दत्तात्रय काळे,अशोकराव मिसाळ, डॉ.शिवाजी शिंदे, बलभीम फुलारी, सरपंच-प्रशासक सुहासिनी मिसाळ,पाणी योजनेचे उपाध्यक्ष संदीप देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री.अभंग पुढे म्हणाले की, भाजप-सेना युक्ती सरकारच्या काळात मी आमदार असतांना प्रयत्न करून भेंडा-कुकाणा व इतर ४ गावांच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला मंजूरी मिळवली, लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी या योजने करिता
ज्ञानेश्वर कारखान्याची १८ एकर जमीन दिली. त्यामुळे १९९८ मध्ये या योजनेचे
भूमिपूजन होऊन काम सुरू झाले. निधी अभावी काम रखडले असतांना
२००० मध्ये माजी आमदार नरेंद्र घुले यांनी अजितदादा पवार यांचे कडे पाठपुरावा करून निधी मिळविल्याने २००५ मध्ये योजना पूर्ण होऊन ती कार्यान्वियीत होऊन नळाव्दारे घराघरात पाणी पोहचले.वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तत्कालीन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी जलजीवन मिशन अंतर्गत २१ कोटी रुपयांची मान्यता मिळवून दिल्याने सहा गावात उंच पाणी टाक्या व अंतर्गत पाणी पुरवठा पाईप लाईनची
कामे सध्या सुरू आहेत.सर्वांच्या सहकार्याने २५ वर्षा पासून ही पाणी योजना सुरळीत सुरू आहे. ८५ किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्याने पाणी योजनेच्या सर्व पंपा करिता लागणारी ८२.५ किलोवॅट विजेची गरज पूर्ण होऊन वीज बिलात ५० टक्के बचत होणार आहे.
या कार्यक्रमाला नामदेव निकम, पंढरीनाथ फुलारी,अशोकराव वायकर, नामदेव शिंदे,सोमनाथ कचरे, दादासाहेब गजरे,रामचंद्र गंगावणे,डॉ. संतोष फुलारी,डॉ.लहानू मिसाळ,मुकुंद अभंग, यडूभाऊ सोनवणे, रोहिदास आढागळे, भेंड्याचे ग्रामविकास अधिकारी रेवनाथ भिसे, कुकाण्याचे ग्रामविकास अधिकारी श्री.आगळे,
महावितरणचे सहाय्यक अभियंता जितेंद्र मालसुरे, सौर प्रकल्प ठेकेदार कल्याण रंधे, श्री.दाणेकर, नितीन कांबळे, पाणी योजनेचे कर्मचारी भाऊसाहेब जगताप,वसंत जगताप, शरद शिंदे,अण्णासाहेब गोर्डे, कचरू निसरगे आदी यावेळी उपस्थित होते.
बाबासाहेब गोर्डे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले.किशोर मिसाळ यांनी आभार मानले.










