भेंडा – नगरशाही वृत्तसेवा
जिल्ह्यातील अनेक पाणी वापर संस्थामधील भ्रष्टचार,गैरप्रकार व गैरव्यवहारा विरोधात दि.१८रोजी चालू केलेले उपोषण मागण्या मान्य झाल्याने व लेखी पत्र मिळाल्याने भारतीय जनसंसदच्या कार्यकर्त्यांनी त्याच दिवशी सायंकाळी मागे घेतले.

कोणत्याही पाणी वापर संस्थेच्या संबंधितांनी पाणीपट्टी रोख स्वीकारू नये, पाणी वापर संस्थांचे लेखापरीक्षण व्हावे आणि पाणी वापर संस्थांनी केलेल्या दुरुस्ती व इतर कामांची माहिती मिळावी यासाठी केलेल्या प्रश्नावर प्रत्यक्ष चर्चेत कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपकार्यकारी अभियंता धनश्री शिंदे, उप अभियंता नेवासा – अभिषेक पवार,उप अभियंता घोडेगाव – संदीप पवार, उप अभियंता चिलेखनवाडी – स्वप्नील देशमुख आदिंनी मान्य केल्या व त्यांनी उपोषण थांबवावे असे आवाहन केले. यावर उपोषणार्थीनी लेखी पत्राची मागणी केली असता,पुढील प्रमाणे लेखी पत्र देण्यात आले.
सर्व पाणी वापर संस्थांनी शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी घेणे व संस्थेने शासनाकडे पैसे भरणेचे सर्व व्यवहार बँकेमार्फत करण्यात यावे,रोख पाणीपट्टी न स्वीकारता शेतकऱ्यांनी बँकेत भरून त्यांची पावती संस्थेकडे घेण्याबाबत कळविण्यात येईल,तसेच पेमेंट गेटवे उपलब्ध करून देण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन मागविण्यात येईल. लेखापरीक्षण न केलेल्या संस्थांना लेखापरीक्षण करण्याबाबत तातडीने कळविण्यात येईल व लेखापरीक्षण अहवाल देण्यात येईल. पाणी वापर संस्थांनी चाऱ्या दुरुस्ती व इतर कामे केलेली आहेत ती माहिती घेऊन सविस्तर माहिती देण्यात येईल. याबाबतीत उपोषणकर्त्यांचे समाधान झाल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
भारतीय जनसंसदचे नेवासा तालुकाध्यक्ष रामराव पाटील भदगले, उपाध्यक्ष कारभारी गरड यांनी दि.१८ रोजी मुळा पाटबंधारे विभागीय कार्यालयासमोर सुरु केलेल्या उपोषणात राज्य निमंत्रक अशोक सब्बन, जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे,नगर तालुका अध्यक्ष पोपटराव साठे, विरबहाद्दूर प्रजापती, राळेगणसिद्धी कार्यालयाचे अन्सार शेख, विकास गाजरे आदी सहभागी झाले होते. तसेच शेतकरी संघटनेचे मनोहर मतकर,शिव पाणंद शेत रस्ते चळवळीचे कानिफनाथ कदम यांनी पाठिंबा व्यक्त केला .










