*जातमुक्त संकल्पनेतून सौंदाळा गावात अनोखी होळी; ‘वाईट प्रवृत्तींचे दहन’ करून दिला ऐक्याचा संदेश.*
भेंडे प्रतिनिधी
सौंदाळा गावात यंदाची होळी पारंपरिक पद्धतीने न साजरी करता सामाजिक ऐक्य आणि समतेचा संदेश देत अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. गावकऱ्यांनी एकत्र येत जातमुक्त गावाच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी वाईट प्रवृत्तींचे प्रतीकात्मक दहन केले.
होळीपूर्वी ग्रामपंचायत परिसरात सर्व समाजबांधवांची बैठक घेण्यात आली. “आपण सर्व एकच गावकरी, एकच कुटुंब” हा संदेश देत कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाने कागदावर आपापल्या त्याग करावयाच्या वाईट गोष्टी लिहिल्या.
या कागदावर ‘जातभेद’, ‘अस्पृश्यता’, ‘उच्च-नीच भावना’, ‘अहंकार’, ‘मत्सर’, ‘दारूचे व्यसन’, ‘अंधश्रद्धा’, ‘घरगुती हिंसा’, ‘भांडणे’ वाईट सवयी,मी….जातीचा,स्वार्थीपणाचे दहन,अन्यायाचे दहन अशा विविध नकारात्मक प्रवृत्तींचा उल्लेख करण्यात आला. सर्वांनी एकत्रितपणे हे कागद होळीत टाकून वाईट प्रवृत्तींचे प्रतीकात्मक दहन केले.
यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी समतेची शपथ घेतली. “जातमुक्त सौंदाळा – एकीचे बळ आमुचे खरे बळ”अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. कार्यक्रमात युवक मंडळ,महिला बचत गट,ग्रामपंचायत सदस्यांचा सक्रिय सहभाग होता.
होळी दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे करताना रासायनिक रंगांना फाटा देत नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे,तसेच पाण्याची नासाडी टाळण्याचे आवाहन करण्यात आले. काही युवकांनी गाव स्वच्छता मोहीमही राबवली.
या उपक्रमामुळे गावात एकोप्याचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक सलोखा अधिक दृढ झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.या वेळी सरपंच शरद आरगडे भिवसेन गरड,गणेश आरगडे,सचिन आरगडे,बाबासाहेब आरगडे,बाबासाहेब बोधक, रामकीसन आरगडे,बाळासाहेब बोधक,लक्ष्मण आरगडे,प्रियंका आरगडे,ज्योती बोधक,आशाबाई आरगडे, स्वाती आरगडे संगीता बोधक मंगल बोधक रंजना आढागळे, कावेरी आढागळे,रुकसाना सय्यद आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सौंदाळा गावाची ही अनोखी होळी परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.










